काळाच्या ओघात काय नाही वाहून जात? साइखेडचा राजवंश नामशेष झाला आहे. रयतही बहुतेक कालवश झाली आहे. कधीपासूनच ती विखरून-विस्कटून गेली होती. तीस सालच्या आसपासचे सगळे लोकचित्र जवळपास पुसून गेले आहे. जाऊन जाऊन ते जाईल कुठे? अकस्मात वाटावे असे ते पुन्हा उगवते, वेगळ्या रुपरंगांनी. साईखेडच्याच नव्हे तर कुठल्याही जनवस्तीच्या बाबतीत हे खरे असावे. साठ वर्षांखाली साइखेडात घडून गेले ते सांगितले तर वाचकांना फार मनभावन होईल, ते विस्मयजनक वाटेल असा ही कहाणी लिहायला घेताना माझा समज होता. पुढे लक्षात आले, की हिच्यात तर आज सर्वत्र अनुभवायला येतोय त्या अनाचाराचा व कुटिलपणाचा एक लहानसा कंद आहे. विस्मयाचे, भयावहाचे आणि हिंसेचे धक्केखोर बीज, या शतकाच्या पूर्वार्धातच, जगभर पेरले गेले आहे. दिसामाजी ते फोफावत आहे. सामान्य सुजनांचा जीव तापल्या तव्यावर भाजून निघत आहे. खळांची वक्रता आणि त्यांच्या अधर्मकरणीचे दुरित ही अनादी आणि अविनाशी आहेत की काय? त्यांनी मानवी जीवनाला ग्रासू नये म्हणून सत्पुरूषांनी केलेल्या प्रार्थना आणि धावे आकाशात कुठवर पोहोचत असतील? कुणाच्या अंत:करणात करूणेचा रिघाव होत असेल? ज्याने त्याने स्वत:लाच कौल लावावा अशी ही निरंतरची व्यथा आहे. अविद्या आणि अधर्म यांनी माणसांच्या मनोभूमीचा कब्जा घेतला आहे. सुखलोलुपता आणि मनमानी आचरण यांचा अंमल व्यक्तिजीवनात दृढमूल होत आहे. ‘मी’ची जाणीव तेवढी बलवान आणि कर्म-अकर्माचा विवेक क्षीण, असे झाले की व्यक्तीला जी विमूढता येते, ती भौतिक व्यवहाराच्या पातळीवरची नसते; नैतिक व आत्मिक स्तरांवरची असते. साहजिकच ती माणसांची जाणीव एकच एक अखंड आहे. संस्कारांनुसार तिच्यातील सत्त्वसंपन्नता कमीअधिक प्रभावाची होते. सद्भभावाचा त्याग करून माणसे अनीतीने वागू लागतात तेव्हा समाजजीवन दु:खकारक व असुंदर होते. मोह आणि द्वेष, स्वार्थ आणि सत्ता ही माणसाला झपाट्याने नैतिक मूर्च्छेत नेतात. तिच्याने जाणिवेवरचे श्रेयस्कराच्या विवेकाचे नियंत्रण सुटते. ती केवळ जैव अस्तित्वाच्या पातळीवर मोकाट वावरते. ज्याला आपण ‘सामाजिक जीवन’ म्हणतो तो मुळात अगणित व्यक्ती-व्यक्तींतील संबंधसूत्रांचा अत्यंत व्यामिश्र गोफ असतो. म्हणून तर कथाकादंबऱ्यांतून या सूत्रांचे पीळ, ताण आणि रंग स्त्रीपुरूषांच्या चित्रणाद्वारे दाखवण्याचा एक प्रयास करता येतो. माणसांच्या क्रिया आणि त्यांची वाणी यांतून त्यांची सुखदु:खे, त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांचे रागद्वेष आकार घेत असतात. नैतिक भ्रांतीचा काळ मागे कधीकधी होऊन गेला आहे आणि आज त्याचा निचरा झाला आहे, असे कधीच नसते. कर्मक्षेत्र हे प्रतिक्षणी कुरूक्षेत्रच असते. या भ्रांतीने मानवी संसार भ्रष्ट आणि अध:पतित होतो. तो होऊ नये म्हणून अविद्या आणि अधर्म यांचा पाडाव करणाऱ्या शक्ती प्रत्येकाने जाणीवपूर्वक जोपासाव्या लागतात. संत-सत्पुरुषांच्या उपासना त्यासाठीच अहोरात्र चालू असतात. कसल्याही झाकोळात आणि धुमश्चक्रीत त्यांचा सद्भा्व आणि त्यांचे शिवसंकल्प त्यांना प्रसन्न आणि प्रेमशील ठेवतात. तामसिकांनाही त्यातूनच प्रकाश मिळतो ती सुजनता आणि परस्परमैत्री यांतूनच. १९२० ते ३० या दशकात एकूण मराठी मुलुखात सामाजिक परिवर्तनाला कारण होणाऱ्या काही महत्त्वपूर्ण घटना होऊन गेल्या. त्यांनी मराठी जाणिवेला जगेपण आणि विकसन दिले. तरी इतिहासाचे यथार्थ आलोचन आणि तदनुसार सम्यक वर्तन यांच्या अभावी एक मूढता आली, आणि एकूण सामाजिक प्रगतीचा झोक गेला. महात्मा जोतीबा फुल्यांनी व त्यांच्या निष्ठावंत सुमनस्क अनुयायांनी जे परिवर्तन अपेक्षिले ते आपल्या समाजात स्थिररूप आणि सफल होण्याचे दिवस आता आले आहेत. साठएक वर्षांनी. या काळातील सामाजिक घडमोडींचे सत्त्व आणि सूंक पाखडून घेण्याची दक्षता ठेवली तर समाजाचे ऐक्य आणि विकसन निश्चयाने साधता येईल. हा ‘तर’ महत्त्वाचा आहे.
Dangora: Eka Nagaricha (डांगोरा: एका नगरीचा)
Price:
$
15.77
Condition: New
Isbn: 8174864008
Publisher: Mouj Prakashan Griha
Binding: Hardcover
Language: Marathi
Genre: Novels and Short Stories,
Publishing Date / Year: 2004
No of Pages: 508
Weight: 660 Gram
Total Price: $ 15.77
Reviews
There are no reviews yet.